अश्विनी वैष्णव यांना मंत्रिमंडळातून हटवा   

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जिवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते; हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजप सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे. पण, घटनेला जबाबदार धरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 
 
गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या, हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले. पण, या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे. 

मुंबईकरांना बुलेट ट्रेन नको, लोकल व्यवस्थित करा

मुंबई परिसरात लोकल हीच लाइफलाइन आहे. दररोज जवळपास ७५ लाख मुंबईकर लोकलने प्रवास करतात. पण, हा प्रवास अत्यंत खडतर व कठीण आहे. घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी परत येईल का? याची चिंता सारखी सतावत असते. लोकलमधील गर्दीमुळे दररोज अपघात होतात. लोकलमधील गर्दी कमी करून हा प्रवास सुखकर करावा, यासाठी सातत्याने चर्चा होते; बैठका होतात. पण, पुन्हा ‘पहिले पाढे ५५’ अशी अवस्था आहे. एखादा अपघात झाली की तातडीने लोकलला बंद दरवाजे बसवण्याची घोषणा केली जाते; पण, कृती शून्य असते. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकलच्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे. पण, रेल्वे प्रशासन व सरकार काही जागे होत नाही. भाजप सरकारला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मुंबईकरांना बुलेट ट्रेन नाही तर लोकल सेवा व्यवस्थित पाहिजे. पण, रेल्वे प्रशासन व सरकार सर्वसामान्य मुंबईकरांच्या जिवाशी खेळत आहे. आता हा खेळ थांबवा, असेही सपकाळ म्हणाले.  
 

Related Articles